श्रीक्षेत्र माहूर (आनंद भालेराव)
प्रत्येक कुटुंबाला नळाद्वारे शुद्ध जल पुरविण्यासाठी भारत सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाने सन 2019 मध्ये जलजिवन मिशन या नावे पाणी पुरवठा योजना लागू केली. त्याचा गवगवा करण्यासाठी जाहिरातीवर करोडो रुपयाचा खर्च केला. या योजनेअंतर्गत माहूर तालुक्यातील 51 गावात कामे मंजूर करण्यात आली,त्यासाठी 53 कोटी एवढा अंदाजित निधी मंजूर करण्यात आला, परंतु आजमितीस एकाही गावातील काम पूर्ण झाले नसल्याने शासनाने केलेला गाजावाजा आजतरी फोल ठरल्याची प्रचिती येत असून उन्हाळा लागण्यापूर्वी या योजनेतील सर्व कामे पूर्ण करण्याची मागणी होत आहे
माहूर तालुक्यातील 51 गावात जलजीवन मिशन अंतर्गतच्या अधिकांश कामांना सन 2022 व 2023 मध्ये कार्यारंभ आदेश देण्यात आला,काम पूर्ण करण्यासाठी कालावधी सुद्धा निर्धारित करण्यात आला, परंतु आजमितीस वसराम नाईक तांडा, सेलू, गोंडखेडी, मच्छिंद्र पार्डी/दासू नाईक तांडा,दिगडी (मो.), गुंडवळ, करंजी, भगवती, हडसणी, मेट, शेकापूर/केरोळी, उमरा, आनमाळ, गोंडेगाव तांडा, गोकुळ गोंडेगाव, कुपटी, लखमापूर, सिंदखेड, मांडवा, पाचुंदा, पानोळा, पवनाळा, रूपानाईक तांडा, शिऊर, सावरखेड (फ्लोराईड ग्रस्त ), बंजारा तांडा, मदनापूर, दत्तमांजरी, आष्टा, सायफळ, टाकळी, वानोळा, मेंडकी, रामपूर, सतिगुडा, इवळेश्वर, लोकरवाडी/मणिरामथड, तांदळा, वायफणी, नेर/लिंबायत,मुरली/नखेंगाव, हरडफ, महादापूर, चोरड, भोरड, नाईकवाडी, बोन्डगव्हाण/चौफुली,दिगडी (बू.), हिंगणी व मुंगशी या गावातील कामे अद्यापही पूर्ण न झाले नाही. त्यामुळे तिथले रहिवाशी या योजनेच्या पाण्यापासून वंचित असून यामध्ये पेसा अंतर्गत येणारी गावे आहेत या योजनेवरील अनेक अधिकारी कर्मचारी बदलले त्यामुळे सगळेच हात वर करत असल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी याकडे तात्काळ लक्ष देण्याची मागणी होत आहे
या योजने अंतर्गत आजमितीस 4 ठिकाणी 25 टक्के,8 ठिकाणी 25 ते 50 टक्के, 21 ठिकाणी 50 ते 75 टक्के व 18 ठिकाणी 75 ते 100 टक्के इतके काम झाले आहे अशी माहिती उपअभियंता प्रमोद बनसोड यांनी दिली.
